अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या राज्यातील रस्ते, पुलांची तातडीने दुरुस्ती करा

By Raigad Times    20-Oct-2020
Total Views |
PWD Minister Ashok Chavan
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
 
मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते व पुलांच्या नुकसानीचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज (20 ऑक्टोबर) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विभागनिहाय आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते व पुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
 
अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अजित सगणे, सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह राज्यातील सर्व विभागातील मुख्य अभियंते व कार्यकारी अभियंते व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
 
मनोज सौनिक व उल्हास देबडवार यांनी पाऊस व पुरामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते व पुलाच्या झालेल्या हानीची माहिती दिली. तसेच प्रत्येक विभागातील मुख्य अभियंत्यांनीही त्या-त्या विभागात झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी दिली. राज्यात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे व ओढे, नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणचे रस्ते व पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद पडली आहे. तसेच अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचा आढावा घेऊन सांगितले की, पुरामुळे झालेल्या रस्ते व पूल दुरुस्ती, नवीन रस्ते बांधणी यासाठी तातडीने निधी देण्यात येईल. अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले, खराब झालेले रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती सुरु करावी. तसेच ज्या ठिकाणी रस्ते खराब झाल्यामुळे वाहतूक बंद पडली आहे, अशा ठिकाणी ते प्राधान्याने दुरुस्त करुन रस्ते वाहतूक योग्य करावी. ही कामे करताना त्यांचा दर्जा व गुणवत्ता नियंत्रणावर मुख्य सचिवांनी लक्ष ठेवावे. तसेच खड्डे पडलेल्या रस्त्याची दुरुस्तीही पावसाळा संपताच सुरु करावी, असे असे निर्देश ना. अशोक चव्हाण यांनी दिले.