सिंधुदूर्ग । तिवरे व सागरतटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळावर विधिमंडळातून शासन नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार वैभव नाईक यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शासन नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार वैभव नाईक यांची नेमणूक झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या 720 किमीच्या समुद्रक्षेत्रामध्ये खाडी व समुद्र किनार्यांवर असलेल्या कांदळवनाच्या संवर्धनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
तिवरे व सागरतटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठान ही तिवरांचे संवर्धन व सागरतटीय जैवविधतेचे संरक्षण करणारी देशातील एकमेव स्वायत्त संस्था आहे. या नियामक मंडळावर कांदळवन व सागरी जैवविविधताच्या विषयाचे तज्ज्ञ म्हणून एफडीसीएम लिमिटेड नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी मच्छिमार सहकारी संघ मर्यादितचे अध्यक्ष रामदास शिंदे, या विषयावर काम करणार्या अशासकीय संस्था म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक यांची निवड करण्यात आली आहे.